उंड्रीत नागरिकांच्या घरात शिरले पाणी   

नाल्याची सीमाभिंत पडल्याने पूर परिस्थिती

पुणे : पुणे महापालिकेने पावसापूर्वी ओढे, नाले सफाई, ड्रेनेज आणि पावसाळी लाईन साफसफाईची कामे हाती घेतली होती. परंतु नाले सफाई वेळेत न झाल्यामुळे आणि पालिकेच्या उदासीन कारभाराचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नाले सफाईच्या अर्धवट कामाचा फटका उंड्री गावातील कडनगर, होले वस्ती भागाला बसला आहेत. या भागातील एका नाल्याची सिमा भींत पडल्यामुळे नागरिकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वडाची वाडी या भागातून हा नाला कड नगरमधून भूमीगत महालक्ष्मी विहार या सोसायटीच्या बाजून वाहतो. काल झालेल्या मुसळधार पावसात पाण्याची प्रवाह वाढल्यामुळे या नाल्याची भींत पडल्यामुळे या परिसरात काही काळासाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
 
शहरात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. तर ओढ्या-नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शहरासह उपनगर भागात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. उंड्री परिसरात दुपारी अडीच वाजता महालक्ष्मी विहार या सोसायटीच्या बाजूने वाहणार्‍या नाल्याची सीमा भींत पडली. यामुळे या परिसरात कंबरे इतके पाणी आले होते. या नाल्याच्या जवळ असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. तर रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. आचानक पाण्याची पातळी वाढल्याने या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली होती. सखल भाग असल्याने पाणी वाहून गेल्याने तीन ते चार तासांनी पाण्याची पातळी कमी झाली. तसेच पाऊस कमी झाल्याने पाणी पातळी कमी झाली. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
 
नाल्याची सीमा भींत पडल्याची माहिती कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाला मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा नाला वडाची वाडीतून गोयल गंगा बांधकाम प्रकल्पाच्या बाजूने वाहत महालक्ष्मी विहार सोसायटीकडून सेंट्रीया बिल्डींगच्या बाजूने गंगा एस्टोरिया सोसायटीकडून पुढे वाहतो. हा नाला महालक्ष्मी विहार सोसयटीपासून पुढे भूमीगत वाहतो. त्यामुळे भूमिगत नाल्याच्या तोंडावर पाण्याचा फुगवटा तयार झाला. पाण्याचा प्रवाह वाढत गेल्यामुळे या नाल्याची सिमा भींत कोसळी. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची प्रकार दर वर्षी घडतो. याला या भागातील नागरिक त्रासले आहेत. पालिकेकडे अनेकवेळा तक्रार केल्यानंतर देखील यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. अशी तक्रार या भागातील गौरी शेंडकर, सुवर्णा कड, रंजना हरगुडे, प्रिया शेंडकर या महिलांनी केली.
 
नाल्याची सीमा भींत पडल्याने कड नगर, होले वस्ती या भागात पाणी आले होते. तात्काळ उपाय योजना सुरु केल्या आहेत. अचानक पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु काही वेळानंतर पाणी वाहून गेले. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. महालक्ष्मी विहार या सोसायटीपासून पुढे हा नाला अंडरग्राउंड आहे. नागरिकांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
 
 - लक्ष्मण कादबाने, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका
 
उंड्री परिसरातील नाल्याची सीमा भींत पडल्याची घटना घडली. शहरासह सामाविष्ट गावांमधील धोकादायक नाल्याची प्राधान्याने सफाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाले सफाईच्या अर्धवट कामे झाल्यामुळे या नाल्याची भींत पडली, असे म्हणता येणार नाही. विभागाचे उपअभियंता प्रत्यक्ष फिल्डवर असून भींत पडण्याचे कारण समजून घेतले जात आहे.
 
- संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग, पुणे महापालिका
 
नाल्याची सफाई केली नाही
 
नाला कोणत्या भागातून वाहतो, याची कोणतीही माहिती नाही. महालक्ष्मी विहार सोसायटीच्या बाजूने नाला वाहतो. या नाल्याची सफाई केली की नाही याची माहिती नाही. परंतु पाणी अचानक आल्याने सगळी घाण आमच्या दाराता वाहत आली आहे. दरवर्षी हा प्रकार घडत आहे. यावर पालिकेने योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी भावना स्थानिकांडून व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. नाल्याची भींत पडल्यामुळे सर्व परिसरात पाणी साचले होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास झाला. दुकानामध्ये आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. दरवर्षी या समस्येला सामोरे जावे लागत आहे असे येथील रहिवाशी सुवर्णा कड यांनी सांगितले.
 
२७ कोटींचा खर्च पाण्यात
 
पावसाळापूर्व कामांसाठी पालिकेने २७ कोटी रुपये खर्ची घातली आहेत. परंतु शहरातील नाल्यांची सफाई, तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता पूर्ण झालेली नाही. अवकाळी पावसाने पालिकेच्या अर्धवट कामांचे पितळ उघडे पाडले आहे. शहरातील विविध भागांतील नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या २३ निविदा, तर पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी १२ कोटी रुपयांची निविदा, असा २७ कोटी रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे. मात्र, तरीही महापालिकेची नालेसफाई, चेंबर दुरुस्ती तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता अद्याप पूर्ण झालेली नाही. शहरात सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, अनेक भागांतील नाले, ओढे तसेच पावसाळी गटारेही तुंबत आहेत. याचा परिणाम शहराच्या विविध भागात दिसू लागला आहे.

Related Articles